Wednesday, February 25, 2026
आक्षी गावात उभे राहणार आरोग्य उपकेंद्र
आक्षी गावात उभे राहणार आरोग्य उपकेंद्र...

देश महाराष्ट्र

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्या विशेष प्रयत्नाने आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून, या उपकेंद्राचे भूमिपूजन शिवसेना (उद्धड बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक यांच्या हस्ते सोमवारी (दि.५) करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त गावातील सेवानिवृत्ती व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

आक्षी गावाची लोकसंख्या सुमारे २ हजार ९०० असून, गांवात मासेमारी नौकांवर, हॉटेल, कॉटेज तसेच विविध रोजगारासाठी सुमारे २ हजार ५०० नागरिक इतर जिल्ह्यातून व परराज्यातून आले आहेत. यामुळे गावात सरकारी दवाखाना असावा अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांनी याबाबत शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत, आक्षी येथे उपकेंद्र मंजूर करून घेतले. या उपकेंद्रासाठी अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार असून, या इमारतीचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सल्लागार सतीश पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, विधानसभा प्रवक्ते धनंजय गुरव, तालुका महिला आघाडी संघटिका स्नेहल देवळेकर, आक्षी सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, अलिबाग नगरसेवक संदिप पालकर, नगरसेविका श्वेता पालकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अश्लेक्षा नाईक, हरिश्चंद्र नाखवा, माजी‌ सरपंच हरिश्चंद्र बामजी, वासुदेव नाखवा, सुनील नाईक, नेहा नाईक, विष्णू बानकर, अरुण ठाकूर, नागेश पेरेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रस्ते, मोठे मोठे पूल यालाच आपण विकास समजतो. मात्र खरा विकास  शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामगिरीतून होत असतो सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आरोग्य सेवेतील गरज ओळखुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्या प्रयत्नाने गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. या उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

: प्रसाद भोईर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख

.

गावात आरोग्य केंद्राची उणीव होती. ही उणीव शंकर गुरव यांच्या प्रयत्नांनी भरून निघणार आहे. नागरिकांना गावात स्वस्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. या आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिल्यानंतर येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित राहतील यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया.

: द्वारकानाथ नाईक 

माजी जिल्हा परिषद सदस्य

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx