अलिबाग : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१३) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत ०.५० टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३१ टक्के इतके आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२५ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ३९४ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. यामधील ३४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ३२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ०.५० टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
निकालात मुलींचीच बाजी
प्रवर्ग - परिक्षा अर्ज - परिक्षेला सामोरे गेलेले - उत्तीर्ण - टक्के
मुले - १८,४९९ - १८,३७८- १७,५१७ - ९५.३१
मुली - १७,११३ - १७,०१६ - १६,५५० - ९७.२६
एकूण - ३५,६१२ - ३५,३९४ - ३४,०६७ - ९६.२५
रोहा तालुक्याचा सर्वात जास्त निकाल
रायगड जिल्ह्यात दहावी परीक्षेत रोहा तालुक्याने बाजी मारली आहे. रोहा तालुक्यातील ९७.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पनवेल ९६.८८, उरण ९५.७८, कर्जत ९६.६८, खालापूर ९३.७५, सुधागड ९१.२८, पेण ९५.४९, अलिबाग ९६.७६, मुरुड ९६.१९, माणगाव ९६.४८, तळा ९६.४०, श्रीवर्धन ९५.८३, म्हसळा ९५.५३, महाड ९७.०७, पोलादपूर ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx