अलिबाग : पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यातील नागांव गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उमटे धरणातील पाणीसाठा घटला असून, ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तीन दिवसआड एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी अशुद्ध आहे. गावात मंजूर असलेली जलजीवन मिशन योजनेचे कामही रखडले आहे. यामुळे नागांव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत, गावात असलेल्या चार तलावातील पाणी शुद्ध करून मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून मिळावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
अलिबाग तालुक्यातील नागांव समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. समुद्रकिनारी दररोज हजारो पर्यटक येतात. तसेच गावाची लोकसंख्या सुमारे १२ इतकी आहे. मात्र गावात पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत नाही. तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे. पर्यटन पूरक व्यावसायिक तसेच ग्रामस्थांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे.
नागांवमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर आहे. मात्र सदर योजनेचे काम रखडले आहे. गावात ४ तलाव आहेत. या तलावातील पाणी शुद्ध करून पाण्याचा वापर केल्यास गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे नागांव गावासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून मिळावा अशी मागणी नागांव सरपंच हर्षदा मयेकर यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx