अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांनी बुधवारी (दि.१६) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यांनतर शेकापच्या हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांनी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर जमून आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी ज्यांनी पक्षासोबत, विचारांसोबत गद्दारी केली, त्यांना शेकाप कार्यकर्ता माफ करणार नाही. कुणाच्याही जाण्याने ही पुरोगामी चळवळ थांबणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विचारांचा कधीच कोणी पराभव करू शकणार नाही, असा विश्वास माजी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समिती माजी सभापती अनिल गोमा पाटील, वृषाली ठोसर, ॲड. नीलम हजारे, नंदकुमार मयेकर आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी ज्या स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुरोगामी विचार रुजविला. ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. जिल्ह्यात शिक्षणाचे द्वार खुले केले, त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करुन, पुरोगामी विचार पायदळी तुडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील, आपले विचारच विकत असतील, त्यांना जागा दाखविल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही. निवडणुकीत प्रत्येकवेळी आघाडी करताना पक्ष वेगळे असतील, मात्र विचार एकच होता. सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही, हे आजच्या हजारोंच्या उपस्थितीवरुन स्पष्ट झाले, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरीबांशी बांधीलकी जपली आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील तसेच ॲड. दत्ता पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम पाटील कुटुंबियांसह शेकापच्या कार्यकर्त्यांनी केले. जे आज सोडून गेले आहेत, त्यांना पक्षाने अनेक पदे दिली. वेगळे अधिकार दिले. परंतु, नाना पाटील, प्रभाकर पाटील व ॲड. दत्ता पाटील यांचा विचार संपविण्याचे काम गद्दारांनी केले असल्याची टीकाही माजी आमदार जयंत पाटील यांनी केली.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx