Sunday, June 1, 2025
रोहयोअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विशेष शिबिरांना उत्तम प्रतिसाद
रोहयोअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विशेष शिबिरांना उत्तम प्रतिसाद...

अलिबाग : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर नुकतेच विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. शिबिराना रायगड जिल्ह्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून, १४ हजार ४७९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 


ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देणे, आणि कुशल व अकुशल कामांच्या मदतीने ग्रामीण भागातील उत्पन्न व पायाभूत सुविधा विकसित करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून रोहयोअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबु लागवड करण्यासाठी १‌ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान ३ वर्षांसाठी देण्यात येते. तसेच वैयक्तिक विहीरीसाठी ५ लाख, शेतीची बांधबंधिस्ती व दुरुस्ती २५ हजार प्रति हेक्टरी, वैयक्तिक शौचालय १२ हजार, शोषखड्डा, कंपोस्ट खड्डा ५ हजार, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड ५० हजार, गोठा शेड १ लाख ७७ हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. 


या कामांसाठी जिल्हाभरातून एकूण १४ हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये फळबाग लागवड १ हजार ९९९ अर्ज प्राप्त झाले असून, वैयक्तिक विहिरी १ हजार १९१, शेत बांधबंधिस्ती व दुरुस्ती १ हजार २९० तर उर्वरित कामांसाठी ९ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले आहेत.


यापुढे ही नागरिकांना वैयक्तिक कामांची मागणी करता येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी कामाच्या मागणीसाठी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त ग्रामस्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx