अलिबाग : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रेवदंडा तलाठी वसुंधरा धुमाळ व चौल मंडळ अधिकारी विजय मापुसकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
तक्रारदार यांनी त्यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेचे मौजे आगरकोट, रेवदंडा येथील जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्याकरिता प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्यासाठी ५ मे रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांची भेट घेतली होती. यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार अशी १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी ६ मे रोजी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा केली.
७ मे तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी मंडळ अधिकारी विजय मापुसकर उर्वरित ५ हजार रुपये नंतर आणण्याबाबत इशारा केला. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वसुंधरा धुमाळ व विजय मापुसकर यांना अटक केली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx