Sunday, June 1, 2025
शेकाप फुटीच्या उंबरठ्यावर
शेकाप फुटीच्या उंबरठ्यावर ...

अलिबाग : रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र रायगड जिल्ह्यात शेकापला घरघर लागली असल्याचे दिसून येते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकही जागा जिंकण्यात शेकापला यश मिळाले नाही. यांनतर आता शेकाप फुटीच्या उंबरठयावर असून, शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या कुटुंबातच फूट पडली असल्याचे  दिसून येते. जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार पंडित पाटील व भाचे ॲड. आस्वाद पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वादात भर पडली. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे आस्वाद पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. अलिबागची उमेदवारी आस्वाद पाटील यांना मिळावी अशी इच्छा पंडित पाटील यांची होती. मात्र जयंत पाटील यांनी सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.


माजी आमदार पंडित पाटील व ॲड. आस्वाद पाटील यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यात शेकाप संघटन गावागावात रुजविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पंडित पाटील व आस्वाद पाटील यांच्या सोबत पक्षाचे काही पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होतील. हा शेकापला मोठा धक्का असून, जिल्ह्यातील शेकापचे वर्चस्वाला भाजपचा जोरदार धक्का ठरणार आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx