Sunday, June 1, 2025
शेतकरी कामगार पक्ष मेळाव्याचा माध्यमातून संघटना, जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना देणार नियुक्तीपत्र
शेतकरी कामगार पक्ष मेळाव्याचा माध्यमातून संघटना, जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना देणार नियुक्तीपत्र...

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा निवड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी (दि.१८) पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या पटांगणात सायंकाळी चार वाजता होणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटना आणि जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे. याशिवाय जुने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन पक्ष वाटचाल करणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेकापमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. गौतम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी व बळ देणारा हा मेळावा असणार आहे. या मेळाव्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे मेळावा स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता वातावरण शांत असल्याने हा मेळावा रविवारी पेझारीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला आदी सर्वच मंडळी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मेळाव्यामध्ये विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरापासून तालुकास्तरावर गठीत केलेल्या वेगवेगळ्या समित्यांवर निवड केली जाणार आहे. त्यामुळे एक वेगळी उमेद घेऊन कार्यकर्ते पूर्ण जोमाने कामाला लागणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.

अशी असेल पार्किंग व्यवस्था

जिल्हाभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अलिबाग, रोहा, मुरुडमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पेझारी चेक पोस्ट ते जुना पेट्रोल पंपाच्या बाजूला, नागोठण्यामार्गे येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पेझारी चेक पोस्ट ते बांधण येथील मोकळ्या जागेत, तर पनवेल, खालापूर, उरण व इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांसाठी वात्सल्य रेसिडेन्सी व पीपी पार्कच्या मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx