अलिबाग : एसटी बस अपघातात १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर एसटी बसेसची तोडफोड करणाऱ्या तसेच वाहतूक रोखून धरणाऱ्या ३३ जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, शांतता भंग करून तणाव निर्माण करणे यासारख्या कलमांखाली या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग शहरात एसटी बस स्थानकासमोर झालेल्या एसटी बसच्या धडकेत जयदीप शंकर बना या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने दोन एसटी बसेसची तोडफोड केली. शहरातील रहदारीचा मुख्य मार्ग जवळपास तीन तास रोखून धरला. जमावबंदी आदेश लागू असताना दिडशे ते दोनश जणांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. पोलीसांनी वांरवार विनंती करूनही जमाव शांत होत नव्हता. त्यामुळे शिघ्रकृती दलासह वाढीव पोलीस बंदोबस्त मागवून पोलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
या प्रकरणी आता आंदोलन करणाऱ्या आठ जणांसह इतर अज्ञात २० ते २५ जणांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक प्रतिक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
* १७ वर्षीय जयदीप बना या मुलाच्या अपघाती मृत्यूस कारणूभूत ठरलेल्या एसटी बस चालका विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भुडोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. योगेश अडसूळ रा. पाटोदा, जिल्हा बीड असे अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकाचे नाव असून त्याला रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.