अलिबाग: अलिबाग, मुरुड तालुक्यात दररोज हजारो पर्यटक येत असतात. यामुळे अलिबाग तालुक्यातील अलिबाग मांडवा बंदर मार्गावर नेहेमी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटक तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलिबाग मांडवा बंदर मार्गावर दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ८ दरम्यान अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. या वाहतूक बंदीतून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. पुढील आदेश पारित होईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपापली वाहने घेऊन येत असतात. त्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरु असल्याने त्यामधून देखील मुंबई येथून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा मार्ग अरूंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नेहमीच अपघात होत असतात. तसेच, दर शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्टीला मुंबई येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
अलिबाग मांडवा बंदर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 4 ते रात्री ८ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx