अलिबाग : अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाणीसाठा खालावला आहे. यामुळे या धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या १२ ग्रामपंचायत हद्दीतील ४५ गावातील सुमारे ६० हजारहून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांना दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी आणखी बिकट होणार असून, तीन ते चार दिवस आड धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून प्राप्त झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८/७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील ४६ गावांतील सुमारे ६० हजारहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
सध्या धरणातील पाणी साठा कमालीचा घटला आहे. धरणात सध्या २५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे धरणातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काही नागरिक खासगी टँकरचे पाणी मागवत असल्याचे चित्र दिसून येते.
गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
पंचेचाळीस वर्षे जुन्या असलेल्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणातील गाळ काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्या धरणातील पाणी साठा घटला असल्याने धरणातून पुरविण्यात येणारे पाणी हे गढूळ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx