अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा चिटणीस, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऍड. आस्वाद पाटील हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांचा पक्षप्रवेश १६ एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ऍड. आस्वाद पाटील यांनी यापूर्वीच शेकापचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाचे असून, दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत. त्याचा संभाव्य भाजप प्रवेश हा शेकापसाठी मोठा धक्का ठरणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वादात भर पडली. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे आस्वाद पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. याचा मोठा फटका शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांना बसला होता. विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनी ऍड. आस्वाद पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच शेकाप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
ऍड. आस्वाद पाटील यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. आस्वाद पाटील हे माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र असून, त्यांनी शेकापमध्ये जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचबरोबर आस्वाद पाटील यांनी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम सभापती पद सांभाळले आहे. आस्वाद पाटील यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी जिल्हा परिषदेत अर्थ सभापती पद सांभाळले आहे. आस्वाद पाटील यांच्या सोबत शेकापचे काही पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx