श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी अतिसंरक्षित श्रेणीतील ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करण्याचे काम निसर्गप्रेमी व वन विभागाच्याध्यातून करण्यात येत आहे. नुकतीच ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ८९ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. नामशेष होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम गेली २० वर्षे हरिहरेश्वर इथं राबवली जात आहे.
यंदाच्या हंगामातील पहिली ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले अरबी समुद्रात झेपावली. संवर्धन केलेल्या अंड्यांतून जन्माला येणारी कासवाची पिल्लांचे संगोपन करून टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती श्रीवर्धन कांदळवन कक्षाकडून देण्यात आली. हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षांपासून ही सागरी कासवांचे संवर्धन करण्याची मोहीम वन विभाग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या सहयोगातून राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर किंवा मार्च, एप्रिलदरम्यान कासवं अंडी देण्यासाठी येतात. अंडी दिल्यावर मादी समुद्रात निघून जाते. ज्या ठिकाणी मादी अंडी देते त्या जागेला कासवाचे ‘घरटे’ असे म्हटले जाते. ही घरटी संरक्षित करण्याचे काम समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे.