Sunday, June 1, 2025
खरीप हंगामात रायगडमध्ये ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड
खरीप हंगामात रायगडमध्ये ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड...

अलिबाग :खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकरी शेताच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. कृषी विभागानेही खरीप हंगामात शेतकर्‍यांना बियाने, खते, किटकनाशकांची कमतरता भेडसाऊ नये यासाठी जय्यत तयारी केली आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात ८१ हजार ३३५ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर २ हजार ५५० हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.


जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या भातपिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. जिल्ह्यात ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर भातपिक घेण्यात येणार आहे. यासाठी शेतीच्या मशागतीचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतली आहे. ठिकठीकाणी राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येते.


आगामी भात पीकाच्या लागवडीसाठी बियानांची कमतरता पडू नये, यासाठी सुमारे १६ हजार २०० क्विंटल बियाने कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बियानांमध्ये जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत २, कर्जत ३, कर्जत ४, कर्जत ५, कर्जत ७ यासह इतर बियानांचा समावेश आहे. तसेच  खरीप हंगामात सुमारे १६ हजार २५ टन खते लागणार आहेत. जिल्ह्यात खत पुरेसे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने खत कंपन्यांसोबत संपर्क साधला आहे. यामध्ये युरीया, एस.एस.पी., एम.ओ.पी. यासह इतर जातींचे खतांचा समावेश आहे.


शेतीक्षेत्रात होणारी घट लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी सुधारीत आणि संकरीत बियाणे घेण्यासाठी तसेच अधुनिक पिक लागवड पध्दतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. गेल्यावर्षी भाताची उत्पादकता प्रति हेक्टरी २ हजार ३४८ किलो ग्रॅम होती. यावर्षी त्यात २ हजार ९९५ किलो ग्रॅम‌ पर्यंत वाढ करण्याचे उदिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx