अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम सुरु झाला असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर मे महिन्यात ग्रामपंचायतींचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांकडे जिल्हा परिषद निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने सरपंचपदाची निवडणूक जिंकून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचा मोठ्या राजकीय नेत्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मागील काही वर्षापासून रखडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे. एका प्रशासनाकडे किमान दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने नागरिकांचाही खोळंबा होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यातील अशा २२० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx