अलिबाग : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ५ मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उरकण्यात आले. मात्र २० दिवस उलटूनही प्रत्यक्षात नवीन इमारतीची एक वीटही रचण्यात आली नाही. नूतन इमारत ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे, त्या जागेत रक्तपेढी आहे. ही रक्तपेढी संबंधित जागेतून हटवून इतरत्र रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी व साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मंजुरीची फाइल लालफितीत अडकून पडली आहे. यामुळे नूतन इमारत उभारणीत अडचण निर्माण झाली आहे. नूतन इमारत उभारणीतील सर्व अडथळे दूर होण्याआधीच भूमिपूजन सोहळा उरकल्यामुळे रायगड वासियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग शहरात जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम १९८० मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाली आहे. वेळोवेळी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तरीही ही इमारत सुस्थितीत आलेली नाही. ही इमारत जीर्ण झाल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.
नवीन रुग्णालय सुविधांसह एकूण ३०० खाटांचे असणार आहे. सध्याच्या जागेतच ही २ लाख चौरस फूट सात मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या मानांकनानुसार खूप अद्ययावत असे रुग्णालय उभे राहणार आहे. पाच लिफ्ट आणि दोन जिने असणार आहेत. मोठे २० खाटांचे डायलिसिस सेंटर, १६ खाटांचे आयसीयू विभाग, अपघात विभाग, अपघात विभागासाठी एक स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, पाच स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ३२ बेडचे बाल रुग्ण विभाग नूतन इमारतीत असणार आहे. यासाठी १५० कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे.
नूतन इमारतीचे भूमिपूजन ५ मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. भूमीपूजन होऊन २० दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. नूतन इमारत ज्या जागेत बांधली जाणार आहे त्या जागेत रक्तपेढीची इमारत आहे. ही रक्तपेढी अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या रुग्णालयाच्या लहान मुलांच्या कक्षात रक्तपेढी हलविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी व साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, रक्त पिढीचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता जिल्हा नियोजन समितीकडून अद्याप मिळालेली नाही. ही प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर रक्तपेढी हलविण्याचे काम सुरू होईल. रक्त पेढी नवीन जागेत सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू होईल.
नवीन रुग्णालयाचे ज्या जागेत बांधकाम होणार आहे. त्याठिकाणी असलेली रक्तपेढी हटविण्याचे काम केले जाणार आहे. ही रक्तपेढी दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात येईल. त्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला आहे. मात्र रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी व साधनसुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर तातडीने रक्त पेढी हटविण्यात येईल.
: डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx