अलिबाग : जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी फिल्टरची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे. यातील आंतर रुग्ण इमारतीमध्ये असणाऱ्या फिल्टरमध्ये मातीसह अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच नवजात शिशू यांच्या विभागात असणाऱ्या फिल्टरमध्येही काही प्रमाणात माती आढळून आली आहे.
या फिल्टरची पाहणी करत असताना तेथील रुग्ण आणि नातेवाईकांनी या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येत असल्याची तक्रार केली. हे पाणी आम्ही किंवा माता यांना दिल्यास उलट्या, जुलाबाची बाधा होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. रुग्णालय हे औषधोपचार, रुग्ण बरे होण्यासाठी आहे की आजार प्रसारासाठी, असा सवालही त्यांनी केला. पाण्या वासाबद्दल येथील कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनहीयांना सांगितले असता ते कानाडोळा करीत असतात. आम्ही वाद केला तर आमच्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे अशी माहिती रुपाली भाटे यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयातील फिल्टरची त्वरित स्वच्छता करून घेतली जाईल. काही ठिकाणी फिल्टर खराब झाले असतील ते बदलण्यात येतील. शिवाय दोन दिवसाआड सर्व फिल्टरची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील.
– डॉ. निशिकांत पाटील,
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx