अलिबाग : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते कंपोस्ट खड्ड्यात कचरा टाकून करण्यात आला. यावेळी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर अभियान ३० सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानांतर्गत गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा व बैठक घेत त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची जनजागृती केली आहे. तसेच गावात दवंडी देत, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात आली आहे. अभियानांतर्गत १ मे ते १० मे या कालावधीत गावातून संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मिती नंतर १५ सप्टेंबर पर्यंत कंपोस्ट खड्ड्यात तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे यांचे सहकार्य घेतले जात आहे.
अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गट विकास अधिकारी शदाजी दाईंगडे, वरसोली ग्रामपंचायतीचे प्रशासक नूतन माने यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी, वरसोली ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx