अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. धरणातील पाणीसाठा खाळावला आहे. खेड्यापाड्यातील महिला व लहाण मुले दोन-दोन किलोमीटरची पायपीट करुन पाणी भरत आहेत. नळाला चार दिवस आड येणाऱ्या पाण्याची काही नागरिक चातकाप्रमाणे वाट पहात असल्याचे चित्र ठिकठिकाणी नजरेस पडते. त्यातच अलिबाग तालुक्यातील डावली रांजणखार गावाला प्रशासनाच्या माध्यमातून टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता आणखी तीव्र होणार आहे.
रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही दरवर्षी जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याच्या योग्य नियोजना अभावी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना करण्यावरच प्रशासनाचा जोर आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष त्याच त्याच गावांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याचे दिसून येते.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अलिबाग तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. डावली रांजणखार गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या पाणी टंचाईची समस्या अलीबाग तालुक्यापुरतीच मर्यादित असली तरी दिवसेंदिवस संपूर्ण जिल्हाभर पाणीटंचाईची झळ बसण्याची चिन्हे आहेत.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखडा
रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, रोहा, सुधागड, अलिबाग, महाड, पोलादपूर तालुक्यांना दरवर्षी पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी ५ कोटी ६२ लाख ६९ हजार खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विंधणविहीरी खोदण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती तसेच इतर उपाययोजना करण्यात येणार आहे.
धरणांमधील पाणीसाठा घटला
रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा खालावला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पाणी टंचाईची समस्या आणखी तीव्र होणार आहे. रायगड जिल्ह्यात कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. यामधील ७ धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, कोथुर्डे या धारणांचा समावेश आहे. सध्या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात सुमारे २० ते ३० टक्के पाणीकपात करण्यात येत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx