अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडीमध्ये आरडीएक्स उतरवण्यात आले होते. त्यांनतर काही शस्त्रास्त्रांचा साठा होडीमध्ये सापडला होता. अशा काही अप्रिय घटना जिल्ह्याच्या ठराविक समुद्र किनारपट्टी भागात घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने समुद्र किनारपट्टीची गस्त वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
अलिबाग समुद्र किनारी पोलीस मित्र शिल्प, अेटीव्ही गस्तीकारचे लोकार्पण मंत्री तटकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
रायगड जिल्ह्याला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. या ठिकाणी तब्बल ३१ समुद्र किनारे आहेत. पैकी 28 समुद्र किनारी नागरिकांसह पर्यटकांचा वावर असतो, तर अन्य तीन समुद्रकिनारी वर्दळ कमी असते. यासाठी वर्दळीच्या ठिकाणांसह निर्जन ठिकाणी गस्ती वाढवणे आवश्यक असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
१९९३ साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्र किनारी उतरवण्यात आले होते. त्यानंतर एका बोटीमध्ये एके-47 यासह काही दारुगोळा देखील पोलीसांनी हस्तगत केला होता. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सुरु असणाऱ्या डिझेल तस्करीला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग समद्र किनारी एक एटीव्ही गस्तीकार देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अन्य समुद्र किनारी अेटीव्ही गस्तीकार देण्याचे नियोजन करावे, असा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना केल्या.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काँग्रेस नेते ॲड. प्रविण ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx