Sunday, June 1, 2025
जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके
जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके ...

अलिबाग : २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात असून, २०२५- २६ या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करण्यात आली आहे. २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अभियानातंर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे

नियोजन करण्यात येत आहे. 


समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे.


इयत्ता पहिलीच्या २१ हजार ३४२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येत असून, इयत्ता दुसरी २३ हजार ६०४, तिसरी २६ हजार ५७१, चौथी २२ हजार ५९७, पाचवी २३ हजार ६६७, सहावी २३ हजार ८३, सातवी २४ हजार ६०२, आठवी २४ हजार १८९ विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx