अलिबाग : पुढील काही दिवसात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील ७ धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, या धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे या धरणातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात सुमारे ३० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने रायगड जिल्ह्याला पुढील काही दिवसात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पुरेसा पाऊस पडूनही रायगड जिल्ह्याला दरवर्षी रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील सुमारे १०० हून अधिक गावे व वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याच्या योग्य नियोजना अभावी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येते. पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना करण्यावरच प्रशासनाचा जोर आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष त्याच त्याच गावांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यात कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. यामधील ७ धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील घोटवडे ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ढोकशेत १८, कवेळे ३९, उन्हेरे ३३, रानीवली २२, वरंध ३५, कोथुर्डे ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणांमधून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात सुमारे ३० टक्के पाणीकपात करण्यात येत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx