अलिबाग : शाळा सोडल्यानंतरही ती शाळा, शिक्षक, शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काहीजण या आठवणी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून जीवंत ठेवतात. रायगड जिल्ह्यातील नांदवी येथील मनोहर जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी असाच एक यशस्वी प्रयोग केला. तब्बल २८ वर्षांनी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले आणि दिवसभर आठवणीत रमले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मनोहर जोशी विद्यालयातील सन १९९७ आणि १९९८ अशा दहावीच्या दोन वर्गांनी ही किमया साधली. नुकतेच शाळेच्या परीसरात या विद्यार्थ्यांनी गुरूजन ऋणानुबंध सोहळयाचे आयोजन केले होते. दोन्ही वर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. महत्वाचे म्हणजे या सोहळ्याला शाळेच्या त्यावेळच्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आमंत्रणाला मान देत सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित राहिले.
शाळेच्या ह. बा. सावंत सांस्कृतिक रंगमंचावर पार पडलेल्या या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात उपस्थित सर्व शिक्षकांना सन्मानीत करून त्यांचयाबददल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेचे संचालक मंडळ असलेल्या विद्याप्रसारक मंडळ नांदवीच्या सर्व विश्वस्तांनाही आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारयांचा आदर सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत सावंत यांनी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. आपण शाळेचे, शिक्षकांचे काहीतरी देणं लागतो ही भावना आज 28 वर्षांनंतरदेखील विद्यार्थ्यांमध्ये आहे ही बाब सुखावणारी असल्याचे ते म्हणाले. सुशील साळवी आणि सुबोध साळवी यांनी शाळेतील दिवसांच्या आठवणींची सुरेख पेरणी करत केलेल्या सुत्रसंचलनाने कार्यक्रमाला चार चांद लावले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थी आणि शिक्षक शाळेच्या त्यावेळच्या आठवणीत रमून गेले. चंदन वाणी, नंदकिशोर खैरे, सुवर्णा पिचुर्ले, सचिन बाईत, अमोल जाधव, प्रफुल्ल पवार या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांबददल कृतज्ञता व्यक्त केली. मित्र-मैत्रीणी आणि शिक्षक यांच्या समवेत घालवलेले ते सुंदर, सुखद दिवस एकेकाच्या मनोगतातून उलगडत गेले. तत्कालीन मुख्याध्यापिका अनघा चौगुले, सदानंद महाजन, रमुला साळवी, एन. डी. जोशी, रमुला मोरे, पुनमचंद लोधी, अशोक जाधव आदि शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दलचा जिव्हाळा आणि शिक्षकांबददल कृतज्ञता व्यक्त करणारया विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेचा परीसर सुंदर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. योगेश मगदूम याने प्रास्ताविक तर अमोल पेलणेकर याने आभार प्रदर्शन केले. दिवसभर आठवणींच्या विश्वात रमलेल्या या विद्यार्थी आणि शिक्षकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx