देश महाराष्ट्र
नागपूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा या २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे २ डिसेंबर रोजी मतदान झालं तरी त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx