अलिबाग : २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असून राज्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववी परीक्षेबाबत आदेश जारी केले असून, पहिली ते नववीची परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल कालावधीत पार पडणार आहे. ते निकाल १ मे रोजी घोषित केला जाणार आहे. यामुळ परीक्षा पार पडल्यानंतर पेपर तपासणी करून, निकाल तयार करताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होणार आहे. या कामासाठी शिक्षकांना केवळ ५ दिवसांचा अवधी मिळणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्याचा विचार करता सुमारे ४ हजार शाळांमधील सुमारे ३ ते साडेतीन लाख विद्यार्थांचा परीक्षेचा निकाल ५ दिवसात तयार करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असेल.
यंदा राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. याआधी या परीक्षा मार्च मध्यापासून ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला टप्प्याटप्प्याने घेतल्या जात होत्या, मात्र यावर्षी सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच कालावधीत पार पडणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याबाबत आदेश जारी केले असून त्यानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
यापूर्वी शाळा त्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेत असत, त्यामुळे काही शाळांमध्ये परीक्षांचा कालावधी वेगवेगळा असे. मात्र यंदा सर्वच शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थी २५ एप्रिलपर्यंत शाळेत उपस्थित राहतील. यामुळे विद्यार्थांची उन्हाळी सुट्टी कमी होणार असून, एप्रिल महिन्याच्या भयंकर उकाड्यात त्यांना शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे.
परीक्षेचा निकाल 1 मे रोजी घोषित केला जाणार आहे. निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक आणि शाळांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे निकाल १ मे पर्यंत तयार करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केवळ ५ दिवसात करावे लागेल. त्यामुळे शिक्षकांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, शिक्षकांची तारांबळ उडणार आहे.