अलिबाग : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन भागात मंगळवारी (दि.२२) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल खांदा कॉलनी येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झाला असून, पनवेलमधील सुबोध पाटील जखमी झाले असून, त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील ३४, उरण तालुक्यातील १ व ठाणे येथील ४ जण जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात पनवेल येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झाला तर सुबोध पाटील जखमी झाले आहेत. तर उर्वरित ३७ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने जम्मू कश्मीर येथील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत या संदर्भात ०२१४१-२२२११८, २२२०९७ तसेच ८२७५१५२३६३, ९७६३६४६३२६ हे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. अडचणीत आलेल्या पर्यटकांनी या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय मदतीसाठी सज्ज असून, जम्मू-काश्मीरमध्ये थेट संपर्कासाठी काही नंबर प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये जम्मू कश्मीर प्रशासनाने जारी केलेल्या ०१९४- २४८३६५१, २४५७५४३ तसेच व्हाट्सअप क्रमांक ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ या क्रमांकाचा समावेश आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx