Sunday, June 1, 2025
पोलिसांनी ५२ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
पोलिसांनी ५२ किलो अंमली पदार्थ केले नष्ट...

अलिबाग : रायगड पोलिसांनी मागील दोन वर्षात विविध १५ गुन्ह्यात जप्त केलेले ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा व १ किलो ४७ ग्रॅम चरस हे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. सदर अमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड कंपनीमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नष्ट करण्यात आले आहेत.


रायगड जिल्हे पोलिस कार्यक्षेत्रातील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड तालुका, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड, खोपोली या १२ पोलिस ठाण्यात नाकोटिक्स ड्रग्ज अॅन्ड सायकोट्रॉपीक सबस्टेन्सेस अॅक्ट नुसार १५ विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा व १ किलो ४७ ग्रॅम चरस या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


सदर अंमली पदार्थ नष्ट करण्याची कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, प्रभारी पोलिस उपअधिक्षक गृह परशुराम कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या देखरेखीखाली न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा संचालनालयाचे सहा. रासायनिक विश्लेषक अ.स.गावकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, रायगडचे क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक सुरेश देवकाते यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx