Saturday, December 27, 2025
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने रचला सापळा
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने रचला सापळा...

अलिबाग :  नागाव येथून रेक्स्यू पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला बिबट्या आक्षी गावातील साखर परिसरात आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (दि.१२) पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा अलिबाग वनविभाग व रोहा वनविभाग रेस्क्यू पथक प्रयत्नशील झाले असून, त्यांनी बिबट्यासाठी सापळा रचला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून, या पिंजऱ्यात खाद्य म्हणून कोंबड्या सोडण्यात आल्या आहेत.

अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत मंगळवारी (दि.९) सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या. परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना बिबट्याला पकडण्यात अपयश आले. बुधवारपासून नागाव परिसरात बिबट्याचे अस्तित्व दिसून आले नाही. यामुळे बिबट्या पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात गेला असावा असा अंदाज बांधून शोध मोहीम थांबविण्यात आली होती. रेस्क्यू पथक परत गेले होते. 

मात्र शुक्रवारी नागाव लगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. यामेळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या आक्षी साखर येथे आल्याची खबर मिळताच अलिबाग पोलीस, अलिबाग वनविभाग अधिकारी व कर्मचारी, रोहा वनविभाग रेस्क्यू पथक आक्षी गावात दाखल झाले. दिवसभर त्यांनी बिबट्याचा शोध घेतला. बिबट्या सापडून आला नाही. साखर परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन असून, यामध्ये बिबट्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दृष्टीने परिसरात चार ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावले असून, या पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या आहेत. रात्री अंधारात बिबट्या शिकारीच्या शोधत बाहेर येईल व तो कोंबड्यांची शिकार करण्यासाठी पिंजऱ्यात जाईल. यावेळी पिंजऱ्याचे दार आपोआप बंद होईल व बिबट्या पकडला जाईल, अशी आशा वनविभागाला लागून राहिली आहे.


बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ८ जण जखमी

मंगळवारी नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत  बिबट्या सर्वप्रथम दिसून आला. या दिवसभरात बिबट्याने ६  जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले होते. यांनतर शुक्रवारी बिबट्या आक्षी साखर येथे दिसून आला. शुक्रवारी सकाळी बिबट्याने दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यामुळे आत्तापर्यंत बिबट्याच्या हल्लात एकूण ८ जण जखमी झाले आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx