महाड : ऐतिहासिक शहर महाडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
महाड येथे समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिना निमित्ताने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, डॉ.भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वतीने रायगड पोलीस दलाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली. तसेच यावेळी हेलिकॉप्टर मधून चवदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. चवदार तळे सुशोभिकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या ७ कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील, असेही संजय शिरसाठ यांनी सांगितले. चवदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापन दिनासंदर्भात शासन तातडीने मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मान्यवरांनी क्रांतीस्तंभ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx