Sunday, June 1, 2025
महाविहाराच्या मुक्तीसाठी बौध्द समाज एकवटला
महाविहाराच्या मुक्तीसाठी बौध्द समाज एकवटला...

अलिबाग : बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशपातळीवर आंदोलन सुरु आहे. भारतीय बौध्द महासभा उत्तर शाखा रायगड आणि वंचित बहूजन आघाडीच्या वतीने या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील बौध्द समाज एकवटला आहे. बुधवारी (दि.१२) दुपारी अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅली असंख्य बौध्द अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भारतीय बौध्द महासभा रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, कोषाध्यक्ष राजेंद्र पावसकर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषा कांबळे, सरचिटणीस छाया गवई, कोषाध्यक्षा त्रिशला सावळे, वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, आदी पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र शासनाकडून अद्यापर्यंत त्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही.  देशभरातील बौध्द अनुयायींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. महाविहाराच्या मुक्तीसाठी बौध्द समाज एकत्र आला आहे. वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बुध्दगया येथील आंदोलनाला पाठींबा दर्शविला जात आहे. भारतीय बौध्द महासभा जिल्हा (उत्तर) आणि वंचित बहूजन आघाडी रायगड जिल्हा उत्तरच्या वतीने या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला.

अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली महावीर चौक, बालाजी नाका मारुती नाका ते  जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली. या रॅलीला बौध्द अनुयायींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठमंडळींसह तरुण मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

अलिबाग शहरातील हिराकोट तलाव या ठिकाणी रॅलीचे रुपांतर सभेमध्ये झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड, उषा कांबळे, दिपक गायकवाड, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले. बुध्दगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौध्दांना सोबत घेऊन बौध्दांच्या ताब्यात द्यावे अशा अनेक मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मागण्याची दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx