Sunday, June 1, 2025
मानकुले-सोनकोठा-हाशिवरे खारबंदिस्तीची दुरावस्था शेकडो एकर भातशेती नापिक
मानकुले-सोनकोठा-हाशिवरे खारबंदिस्तीची दुरावस्था शेकडो एकर भातशेती नापिक...

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील माणकुले-सोनकोठा-हाशिवरे खारभूमी योजनेची खरभूमी विकास विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दुरावस्था झाली आहे. २०२० रोजी सुरू करण्यात आलेल्या खरभूमी योजनेच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट राहिले आहे. यामुळे ठेकेदार बदलण्याची वेळ शासनावर आली आहे. परिणामी योजनेचा खर्च ९ कोटी ६५ लाख रुपयांवरुन २२ कोटी ७० लाखांवर पोहचला आहे. योजनेचे काम अर्धवट राहिल्याने माणकुले, बहिरीचा‌ पाडा या गावातील‌ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून,‌ खारे पाणी शेतीत घुसल्याने परिसरातील शेकडो एकर शेतजमीन नापिक झाली आहे. तसेच वारंवार उधानाचे पाणी गावात घुसल्याच्या घटना घडत आहेत.


माणकुले-सोनकोठा-हाशिवरे खारबंदिस्तीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे या योजनेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामांसाठी ९ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये ८.६ किलोमीटर बंधारा तसेच ५ उघड्या बांधण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. सदर कामाचा ठेका रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदाराला २० फेब्रुवारी २०२० रोजी देण्यात आला. सदर काम २४ महिन्यात पूर्ण करण्याची अट ठेवण्यात आली होती. मात्र विहित मुदतीत तसेच मुदतवाढ देऊनही ठेकेदाराला काम पूर्ण करण्यात अपयश आले. ठेकेदाराने केवळ सुमारे ३ किलोमीटर ६०० मीटर बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. तसेच जवळपास २.१ कि.मी पिचिंग व कवच बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. संबंधित कामाच्या बदल्यात ठेकेदाराला सुमारे ७ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. केलेले सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी ग्रामस्थानी केल्या होत्या. ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्याने आहे त्या स्थितीत काम अंतिम करून ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. 


सुधारित अंदाजपत्रक २२ कोटी ७० लाख खर्चाचे करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या ठेकेदाराला दिलेले ७ कोटी रुपये वजा करून उर्वरित रकमेतून खारबंदिस्तीचे शिल्लक राहिलेले काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. खरभूमी विकास विभाग सुरुवातीच्या ठेकेदारावर विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तिजोरीवर कोट्यवधी रुपयांच भार पडल्याचे दिसून येत आहे.

 

खारभूमी विभागाचा कारभार वादात

माणकुले-सोनकोठा-हाशिवरे खारबंदिस्तीची करण्यात आलेले ३ किलोमीटर ६०० मीटर लांबीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत खारेपाट शेतकरी संघटनेने तक्रार अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते. त्यानुसार २९ सप्टेंबर २०२२ रोजी नारंगी मंडळ अधिकारी, खारभूमी विकास उपविभाग कार्यालयाचे प्रतिनिधी, हाशिवरे ग्रामपंचायत सरपंच, लाभधारक, तक्रारदार यांनी संयुक्तपणे पहाणी केली. या पहाणीत भराव करताना मुरुम न‌ वापरता खरबंदिस्ती बांधाच्या बाजूची माती वापरल्याचे दिसून आले. तसेच सदरचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा अहवाल कामार्ले मंडळ अधिकारी यांनी अलिबाग तहसीलदार यांना सादर केला आहे. या अहवालानंतर ठेकेदाराचे बिल थांबविणे गरजेचे होते. मात्र खरभूमी विकास विभागाने ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल अदा केले. तसेच खारबंदिस्तीची काम आहे त्या स्थितीत अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात आली.


शेतकरी चिंतेत 

माणकुले-सोनकोठा-हाशिवरे खारबंदिस्तीची दुरावस्था झाल्याने खारे पाणी शेतीत घुसून शेकडो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. पाण्यासोबत खारफुटी शेतीत उगवली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. उपजिविकेचे साधन नष्ट झाले आहे. तसेच खारबंदिस्ती उभारण्यात न आल्याने उद्यानाचे पाणी वारंवार गावात घुसण्याचा घटना घडत आहेत. पावसाळ्यात मोठे उधाण आल्यास येथील घरांमध्ये पाणी घुसते यामुळे घरातील साहित्य, अन्नधान्य याचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx