अलिबाग : आपल्या मुलीचे प्रेम संबंध तोडण्यासाठी नवी मुंबई येथील अखलाक अयुब खान व रेश्मा अखलाक खान यांनी मांत्रिकाचा सहारा घेतला. मांत्रिकाने त्यांना मंतरलेल्या २५ विटा देत त्या विहिरींमध्ये टाकण्यास सांगितल्या. या विटा अखलाक खान हा मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना, काही ग्रामस्थानी पहिले. त्यांना विहिरीत त्यांनी विष टाकल्याचे संशय आला. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. रेवदंडा पोलीसांनी खान याला ताब्यात घेत तपास केल्यानंतर हा बुवाबाजीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. यांनतर अखलाक खान यांच्यासह पोलीसांनी संबंधित विहिरीमधील पाणी पित विहिरीत विष टाकल्याचा ग्रंथांचा गैरसमज दूर केला. याप्रकरणी पोलीसांनी अखलाक खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई नेरूळ येथील अखलाक अयुब खान व रेश्मा अखलाक खान यांच्या मुलीचे तुर्भे येथील एका मुलासोबत मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रेम आहे. या प्रेम प्रकरणाला त्यांचा विरोध आहे. मात्र मुलगी मुलीसोबत लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. तसेच आई वडील लग्न लावून देत नसल्याने मुलीने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे हे प्रेम संबंध तोडण्यासाठी अखलाक खान यांनी कल्याण येथील एका मांत्रिकाकडे धाव घेत मांत्रिकाला मुलीचे प्रेम संबंध तोडण्याकरिता उपाय करण्यास सांगितले. संबंधित मांत्रिकाने मंतरलेल्या २१ विटा देत, त्या विटा २१ विहिरींमध्ये टाकण्यास अखलाक खान सांगितले होते.
त्यानंतर अखलाक खान व रेश्मा खान यांनी काही विटा नविंमबई मधील विहिरीत टाकल्या. दरम्यान खान दाम्पत्य नातेवाईकाकडे लग्न कार्याकरीता मुरुड तालुक्यातील चोरढे येथे आले होते. यावेळी ते आपल्याकडील मंतरलेल्या शिल्लक असलेल्या विटा सोबत घेऊन आले. अखलाक खान हा रविवारी या विटा ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. यावेळी स्थानिकांनी जवळ जाऊन त्याला याबाबत विचारणा केली, त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखलाक खान याने विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय स्थानिकांच्या मनात निर्माण झाला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक विहिरीजवळ जमा झाले. काही काळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी खान याला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले. त्याने पाणी पिण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला. अखेर त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीसांनी अखलाक खान याची विचारपूस केल्यावर मुरूड तालुक्यातील मजगाव येथील जावई असल्याची माहिती देत, चोरडे येथे एका लग्न समारंभासाठी आल्याचे सांगितले. तसेच विहिरीत आपण मांत्रिकाने मुलीचे प्रेम प्रकरण तोडण्याकरिता दिलेल्या विटा टाकल्याची माहिती दिली. यांनतर पोलिसांनी अखलाक खान याला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले, व स्वतः पाणी प्यायले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx