Sunday, June 1, 2025
रविवारी मुंबई गोवा महामार्गावर जड, अवजड वाहतुकीस बंदी
रविवारी मुंबई गोवा महामार्गावर जड, अवजड वाहतुकीस बंदी...

अलिबाग : होळी व धुलीवंदन सणासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील आपल्या गावी आले आहेत. तसेच या सणांना लागून शनिवार व रविवार आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने कोकणातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. चाकरमानी व पर्यटक रविवारी परतणार असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी मुंबई गोवा महामार्गावर दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.


गुरुवारी होळी, शुक्रवारी धुलीवंदन व त्यानंतर शनिवार, रविवार अशा सुट्ट्या आल्याने चाकरमानी व पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. बहुतांश चाकरमानी व पर्यटक रविवारी परतीचा प्रवास करणार आहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वर्दळीत वाढ होईल. त्याचबरोबर जड, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघात घडण्याची शक्यता आहे.


रविवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी महामार्गावर कशेडी ते खारपाडा दरम्यान जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खोपोली वाकण मार्गावर पालीफाटा ते वाकण दरम्यान जड अवजड वाहतुक बंद करण्यात येणार आहे. या बंदितून दुध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx