Sunday, June 1, 2025
रांजणखार डावली ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा
रांजणखार डावली ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा...

अलिबाग : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर असून, कामाची मुदत संपूनही योजना कार्यान्वित झालेली नाही. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत आणावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, सोमवारी (दि.३) ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत शासनाचा निषेध केला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...., या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय..., आम्हाला पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा... अशा जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.

अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली हे गांव तालुक्यातील शेवटचे टोक असून, गावात दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. गाव समुद्रकिनारी असून, विंधनविहिरी व विहिरींना खारे पाणी लागते. यामुळे येथील ग्रामस्थांना प्रशासनाकडून नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र सध्या गावात नळ पाणी पुरवठा योजनेतून १५ दिवस आड पाणी पुरवठा सुरू असल्याने, ग्रामस्थांन पाणी विकत घ्यावे लागत आहे. रांजणखार डावली ग्रामस्थांचा पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ रोजी जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली आहे. ठेकेदाराने अत्यंत संथ गतीने काम केल्यामुळे या योजनेचे‌ काम पूर्ण करण्याची मुदत संपूंही योजना कार्यान्वित झाली नाही. यामुळे येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

यामुळे रांजणखार डावली ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवारी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढीत शासनाचा निषेध केला. या मोर्चात रांजणखार डावली ग्रामपंचायत माजी सरपंच हेमंत पाटील, दर्शना पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान रांजणखार डावली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी किशन जावळे व निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते. गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व संदेश शिर्के यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गावाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या लाईनवर असलैली बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx