अलिबाग : रेवस व करंजा दरम्यान प्रवासी रो रो सेवा प्रस्तावित आहेत. या अनुषंगाने रेवस व करंजा बंदरांवर कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र मागील सहा वर्षांपासून ही कामे रखडली आहेत. करंजा बंदर स्थानिकांकडून जोड रस्त्याच्या कामात विरोध झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. तर रेवस बंदरातील काम ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे उर्वरित काम रखडले. यामुळे रेवस बांधावरील ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली असून, सुधारित मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. दरम्यान दोन्ही बंदरांवर रो रो अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांवर आत्तापर्यंत साडे अठरा कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या दोन्ही जेट्टीचे काम करण्यात येत आहे. करंजा येथे रो रो अनुषंगाने २०१८ मध्ये कामे हाती घेण्यात आली. करंजा येथे रो रो अनुषंगाने जेट्टी तसेच इतर कामे करण्यासाठी ९ कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून, ५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्चही झाला आहे. मात्र स्थानिकांकडून जोड रस्त्याच्या कामात विरोध झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
तसेच रेवस बंदरावर २०२० पासून रो रो अनुषंगाने कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी २५ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. ज्यापैकी १३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र ठेकेदारच्या अकार्यक्षमतेमुळे उर्वरित काम रखडले. आता ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली असून सुधारित मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रेवस येथील जेट्टीचे काम सध्या बंद आहे. त्यामुळे या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.
रो रो सेवा चालणार का?
दरम्यान, रेवस करंजा दरम्यान सागरी पूल मंजूर आहे. रेवस करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस ते करंजा दरम्यान अंतर वाहनाने दहा मिनिटांच्या आत पार करणे सहज शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रो रो जहाजात वाहने पार्क करणे, त्यांनतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx