अलिबाग : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर १५ व १६ मे रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नागरिकांनी शिबिरांमध्ये सहभागी होऊन वैयक्तिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देणे, आणि कुशल व अकुशल कामांच्या मदतीने ग्रामीण भागातील उत्पन्न व पायाभूत सुविधा विकसित करणे हा ह्या योजनेचा हेतु आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबु लागवड करण्यासाठी १ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान ३ वर्षांसाठी देण्यात येते. तसेच वैयक्तिक विहीरीसाठी ५ लाख, शेतीची बांधबंधिस्ती व दुरुस्ती २५ हजार प्रति हेक्टरी, वैयक्तिक शौचालय १२ हजार, शोषखड्डा, कंपोस्ट खड्डा ५ हजार, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड ५० हजार, गोठा शेड १ लाख ७७ हजार रुपये असा लाभ देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींनी गावातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच नागरिकांनी कामाच्या मागणीसाठी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx