अलिबाग : रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगर वाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही. उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. यातील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात. यामुळे जंगलातील वनसंपदेचे नुकसान होते. त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते. रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीतील रहिवाश्यांना याचाच प्रत्यय आला.
वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी सायंकाळी वणवा वाडीपरिसरात पसरल्याचे लक्षात आले. मात्र तोवर वणव्याने चहू बाजूने वाडीला वेढले होते. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी तातडीने रोहा येथून अग्नीशमन दलाला तसेच एसव्हीआरएस बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरीकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत ४८ घरे जळून खाक नष्ट झाली.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx