मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना, यासह कायदा-सुव्यवस्थेवरून गृह खात्याला विरोधक लक्ष्य करतील, अशी शक्यता आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, यावर ते सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. एकजूट दाखवण्याची विरोधकांना अधिवेशनात संधी असेल.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. मविआतील कोणत्याही घटक पक्षाकडे २८ पेक्षा जास्त आमदार नाहीत. विरोधी पक्षनेते पदासाठी एक दशांश आमदार हे पद मागणाऱ्या पक्षाकडे असायला हवेत, असा नियम नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. तो मान्य झाला तर भास्कर जाधव यांना हे पद दिले जाऊ शकते. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे.
बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अधिवेशनात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैद्याची शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक दबाव आणतील.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx