अलिबाग : जय जय जय भवानी, जय जय जय शिवाजीच्या
जयघोषात... ढोल ताशांच्या गजरात... लेझीम, मर्दानी खेळांच्या संगतीने... पोवाडे व शिवमहतीची गीतांच्या समधुर स्वरात...भगवे झेंडे फडकावीत... अशा उस्ताहपूर्ण वातावरणात शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि.१९) शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यातील अलिबाग शहरात तसेच परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत सुमारे ५ विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.
अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथून रायगड जिल्हा प्रशासनातर्फे “जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते झेंडा दाखवित पदयात्रेस सुरुवात करण्यात आली.
पदयात्रेत छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थींनी लक्ष वेधून घेत होत्या. ही पदयात्रा पोलीस कवायत मैदान अलिबाग येथून वरसोली बीच रस्तामार्गे विठ्ठल मंदिर वरसोली कडून मांडवा अलिबाग मार्गावरुन रायगड बाजार मार्गे अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शालेय विद्यार्थांनी विविध मैदानी खेळ, पारंपारिक नृत्य, पोवाडा ,गायन अशा विविध कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनले होते. या पदयात्रेत विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
..........................
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. रयतेच्या हिताला प्राधान्य आणि सर्वाचा आदर, सन्मान करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच आपल्याला देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला. ् आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण शिवाजी महाराज कटाक्षाने राबवत असत.
: श्रीमंत कोकाटे
जेष्ठ इतिहास संशोधक.
.......................
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx