नवीमुंबई : नेरूळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे लोकार्पण महापालिका प्रशासनाकडून चार महिन्यांहून अधिक काळापासून रखडले होते. यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेने रविवारी (दि.२६) पुतळ्याचे अनावरण अचानकपणे केले. ही कृती नियमबाह्य असल्याचे सांगत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेरूळच्या राजीव गांधी पुलावरून उतरताच पूर्वेला असलेल्या चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संपूर्ण चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही पुतळा ४ महिन्यांहून अधिक काळापासून झाकून ठेवण्यात आल्याने शिवभक्तांसह स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. रविवारी दुपारी २.२४ वाजता मनसेने नेते अमित ठाकरे, शहराध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्ते पुतळा असलेल्या चौकात पोहोचले. यावेळी पोलिसांनी आक्षेप व्यक्त करूनही कार्यकर्त्यांनी पुतळ्यावरील मळके कापड काढून पुतळ्यावर जलाभिषेक करत अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण केले.
या नंतर महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ही कृती संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय करण्यात आल्याने अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याची गंभीर दखल घेत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे उल्लंघन व परवानगीशिवाय अनावरणाचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx