अलिबाग : अलिबाग तालुक्यातील महत्वाच्या सासवणे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सात सदस्य यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याबबतचे आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमिता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सत्यवान गजानन कोळी यांनी यासंदर्भातील अपील कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केले होते. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ९७ हजार ५०० रूपये, ३ लाख ६३ हजार रूपये व २ लाख ६५ हजार १५१ रूपये अशा रकमा ग्रामपंचायतच्या खात्यातून स्वतःच काढल्या आहेत. नंतर मजुरांना रोखीने रकमा अदा केल्याचे दिसून आले. ग्रामनिधीच्या कॅशबुकवरून सरपंच व ग्रामसेवक यांनी रोखीने खर्च करून २ लाख ६३ हजार ४७१ रूपयांची आर्थिक अनियमितता केली असून त्यामुळे ग्रामपंचायत लेखासंहितेतील नियमांचा भंग झाला आहे.
याला ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही संयुक्तरित्या जबाबदार असले तरी ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजुर करताना सर्वानुमते मंजुर झाले आहेत. पंचायतीच्या प्रत्येक सभेत भाग घेण्याचा कारभारावर देखरेख ठेवण्याचा, मिळकत आणि ग्रामनिधी यांचा योग्य विनियोग होतो की नाही यावर लक्ष ठेवण्याचा, त्यासाठी पंचायतीचे कागदपत्र पाहण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला आहे. अशी तरतूद असताना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपस्थित सदस्यांनी ठराव करताना सर्वानुमते मंजुर केले असल्याने त्यांचाही या अनियमितेत थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आर्थिक आणि प्रशासकीय स्वरूपातील अनियमिता लक्षात घेऊन कोकण आयुक्तांनी जिल्हा परिषदे कडून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागवला होता. ग्रामपंचायत सरपंच आणि सरपंच तसेच इतर सदस्य यांच्याकडून आर्थिक अनियमित्ता झाल्याचे सिद्ध झाले. या अहवालानंतर कोकण आयुक्तांनी सासवणे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx