अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरात सिनारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पुर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ३५६ कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना खारेपाट विभागातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. या संपुर्ण निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचबरोबर कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील २८ गावांना फिल्टर पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला एमआयडीसीने तत्काळ प्रशासकीय मान्यता देत १५ मे रोजी एमआयडीसी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा रद्द करावा, अशी लेखी विनंती केली. त्यानुसार हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची घोषणा राजाभाई केणी यांनी केली आहे
कुसुंबळे विभागातून जिल्ह्यातील मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना पाण्याची पाईपलाईन जात असताना येथील नागरिक पाण्यापासून वंचित होते. राजाभाई केणी यांनी येथील हजारो नागरिकांना न्याय मिळवून देताना एमआयडीसीकडून फिल्टर प्लॅंटच्या कामाला तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून राजाभाई केणी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून सिनारमन्स कंपनीसाठी पाईपलाईन जात आहे, त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नव्हते. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या भूमिकेलाच या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होत. यासाठी शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापुर्वी एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्याशी झालेल्या चर्चेत या मागण्या मान्य करण्यात आल्या. चर्चा करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, अलिबाग तालुका संघटक जीवन पाटील, शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे सदस्य स्वप्नील म्हात्रे, मन्मय पाटील, मेघनाथ पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, संतोष पाटील, प्रदिप केणी, आदर्श पाटील, नाना खराडे, रघुनाथ पाटील आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या यशस्वी चर्चेनंतर खारेपाट विभागात उत्साहाचे वातावरण आहे. धेरंड-शहापुर येथील सिनारमन्स प्रकल्पासाठी एकरी ९६ लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे. तर ज्यांच्या जमीनीतून ही पाईप लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांशी एक शब्दाची चर्चाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. या विरोधात येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचे म्हणणे संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केणी यांचे आहे. १५ मे रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आला असला तरी येथील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने लढत राहणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी येथील नागरिकांना दिली आहे.
३५६ कोटीच्या निविदा रद्द
प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी १६७ कोटी ०८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चुन पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चुन जॅकवेल बांधली जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने निविदा प्रक्रिया पुर्ण केली. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी सांगितले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx